महाआघाडी सरकार रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणारे, #LetterToAmbedkar मोहिमेत जयंत पाटलांचा सहभाग

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे यंदा कोणतेच सण उत्सव साजरे करता आले नाही. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखत गर्दी न करता घरीच सण उत्सव तसेच जयंती पुण्यतिथी साजरी केली आहे. राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते त्याला आंबेडकरी अनुयायांकडून प्रतिसाद दिला असून नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्याच अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांतर्फे #LetterToAmbedkar ही मोहीम राबवली जात आहे. ज्यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन केले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे. महाविकास आघाडी सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार, कितीही हल्ले झाले तरी समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं रक्षण करणार असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

काय म्हणालेत जयंत पाटील आपल्या पत्रात…..
प्रिय बाबासाहेब,
देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळतोय आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!