पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक: राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली. अवघ्या तीन हजार ७३३ मतांनी समाधान आवताडे विजयी झाले. अत्यंत चुरशीने ही निवडणूक पार पडली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे अँड नितीन माने यांनी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. तसं पत्रही निवडणूक आयोगाला पाठवले असून त्यामध्ये काही मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेदचा वापर करण्यात आला.
त्याचबरोबर भाजप उमेदवार समाधान आवताडे आणि विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, अशी धमकीही देण्यात आली होती. त्यामळे त्या संदर्भातील काही मागण्या असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्या कारखान्यांचे, कार्यालयाचे तसेच घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. त्याचबरोबर दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे.समाधान आवताडे यांच्या कंट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करण्यात यावा.निवडणुकीच्या दरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. तसेच समितीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक पद्धतीने फेरनिवडणूक घेण्यात यावी. आदी मागण्या केल्या आहेत. याबाबतचे पत्र मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवलं आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक चुरशीची झाली. राष्ट्रवादीसह भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रविवारी मतमोजणी पार पडली. अखेर अटीतटीच्या या लढतीत महाविकास आघाडीला दणका देत भाजपच्या समाधान आवताडे यांनी बाजी मारली. समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली. अवघ्या तीन हजार ७३३ मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.