दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या मदतीने कौटुंबिक वादातून मेव्हण्याला बेदम मारहाण करत ६ वर्षीय भाच्याचे दीड कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या एका फौजदारासह तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील चेम्बूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला फौजदार अमोल चव्हाण, मुलाचा मामा कृष्णा बापूराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

काय आहे प्रकरण ?

पुंडलिक नगरमधील विद्यानगर परिसरात अड. श्रीकांत तात्यासाहेब वीर राहतात. मागील एक वर्षापासून त्यांच् पत्नी अड. सोनाली यांच्याशी पटत नाही. त्यामुळे ते दोघे विभक्त राहतात. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) ही मुलं आहेत. आर्या सोनाली यांच्यासोबत तर मुलगा रमन वडिलांसोबत राहतो. मुंबईतील न्यायालयात दोघांचा कौटुंबिक वाद सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर १८ एप्रिल रोजी श्रीकांत वीर यांनी रमनला न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख २९ जून दिली होती.

काय घडलं त्या दिवशी ?

अड. श्रीकांत वीर हे त्यांच्या विद्यानगर येथील घरी असताना फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर आणि शांभवी मालवणकर यांच्यासह ७ जण हातात लाठ्या काठ्या घेऊन आले. ते फ्लॅटमध्ये घुसले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून रमनला जबरदस्तीने घरातून हिसकावून नेले.

१.५ कोटींच्या खंडणीची मागणी

रमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर यांच्याकडे दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मुलगा सुखरुप परत पाहिजे असेल तर दीड़ कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर मुलाचा जीव कसा घ्यायचा हे आम्हाला ठाऊक आहे. अशी धमकी दिली. श्राकांत यांना बेदम मारहाण करत असताना श्रीकांत यांच्या वृध्द आई वडिलांना देखील त्यांनी मारहाण केली. हा प्रकार रस्त्यात घडत होता. त्यावेळी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्या सर्वांना पोलिसांनी पकडले.