…तर संपूर्ण राज्यभर गुरव समाजाचे आंदोलन

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव येथील रितिका आमले हिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर तात्काळ कडक कारवाई न झाल्यास अखिल गुरव समाज संघटना संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारेल, असा इशारा गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष ऍड. अण्णासाहेब शिंदे यांनी दिला.

नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव येथील रितिका आमले या अल्पवयीन मुलीचा एक महिन्यांपूर्वी घातपाती मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेला एक महिना उलटून गेला तरी सिन्नर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या अखिल गुरव समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याची मागणी केली. रितिका आमले हिच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी आठ दिवसांत न लावल्यास संपूर्ण राज्यभर अखिल गुरव समाज संघटना शांततेच्या मार्गाने आंदोलन करून पोलीस प्रशासनाचा धिक्कार करेल,  असा इशारा ही आण्णासाहेब शिंदे यांनी दिला.

गुरव समाजावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने गुरव समाजाला सुरक्षेचे कवच म्हणून अट्रोसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणीही आण्णासाहेब शिंदे यांनी केली. यापूर्वी अखिल गुरव समाज संघटनेने सिन्नर पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र सिन्नर पोलिसांनी या प्रकरणी कानाडोळा केल्याची चर्चा आहे.

यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यावतीने गणेश मंडलिक यांनी निवेदन स्वीकारले. तर अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी गुरव समाज संघटनेचे जेष्ठ नेते मिनानाथ पांडे, वसंतराव बंदावणे, अशोकराव पांडे, अकोले टाईम्सचे संपादक अमोल शिर्के, सुरेखा तोरडमल, डॉ.राम चौधरी, रवींद्र पांडे, माधव शिर्के, दत्ता रत्नपारखी, नवनाथ पांडे, सचिन चौधरी, गणपत पांडे, विजय पारासूर, शारदा शिंगाडे, ज्ञानेश्वर चौधरी, दत्ता बंदावणे, सुरज पांडे, योगेश पांडे, रामदास पांडे, नितीन पांडे, खंडू पवार आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com