विधानसभेची तयारी करताना ‘या’ निवडणुकीची देखील तयारी करा ; पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधीका-यांची बैठक राष्ट्रवादी भवनात पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दल चिंतन या बैठकीत करण्यात आले.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभावाची कारणे या बैठकित शोधण्यात आली. लोकसभेनंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघीत यश मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुंबई, पालघर, नवी मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच ज्या विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे त्या मतदारसंघांची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये प्रामुख्याने, मतदार याद्या दुरुस्त करून घेण्यावर चर्चा झाली. मतदार याद्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसल्याने या याद्या अद्यावत करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत असताना आपल्या पक्षाच्या जास्त जागा येतील अशाच जागांची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (EVM) ला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामे केली असताना देखील पक्षाला पराभव स्विकारावा लागला. हा पराभव कशामुळे झाला याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या कामाची पहाणी करण्याचे आदेश यावेळी नेत्यांना आणि कार्य़कर्त्यांना देण्यात आले.

यावेळी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हाणाले, निवडणुका येता आणि जातात मात्र लोकांच्या हिताची कामे करत रहा. मुंबईच्या प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्य़ालये सुरु करून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहून कामे करा. तसेच त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. विधानसभेची तयारी करत असताना महापालिकेच्या निवडणुकांची देखील तयारी करण्यास सुरुवात करा. त्यामुळे महापालिकेत देखील पक्षाला यश मिळेल. पक्षातील आजी-माजी आमदार, नगरसेवक यांनी पक्षाची बंधणी करण्याचे काम करावे असे आवाहन शरद पवार यांनी केले.