राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत महासंचालक कार्यालयानं घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन देखील 24 तास प्रयत्नशील आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनानं चालु आर्थिक वर्षामध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्याबाबत शासन निर्णयामधील मुद्या क्रमांक 15 मध्ये सर्वसाधारण बदलीबाबत सुचना देखील दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत आता महासंचालक कार्यालयानं मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन् चालु वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करू नयेत असे आदेश सामन्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस महासंचालक कार्यालयातील अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत कु. सारंगल यांनी सर्व घटक प्रमुखांना चालु वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बदली करू नये असे सांगितले आहे. त्याबाबतचे परिपत्रिक अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत कु. सारंगल यांनी आज (मंगळवार) काढले आहे.