‘पाऊस’ नसताना देखील ‘पंढरपूर’ पुराच्या ‘विळख्यात’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाचा थेंब नसताना सध्या पंढरपूर पुराच्या विळख्यात सापडले आहे. पंढरपूर शहरातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून जवळपास ६ हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाऊस नसताना उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

उजनी धरण ९७ टक्के भरले असून धरणात पुणे जिल्ह्यातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. त्यामुळे सध्या धरणातून १ लाख ७० क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे़ तर वीर धरणातून ७८ हजार ३२५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागा नदीत मिळत असल्याने पंढरपूरला पाऊस नसताना पुराचा सामना करावा लागत आहे.

सध्या पंढरपूरात संगमावरुन २ लाख १० हजार क्युसेक पाणी वाहत आहे. त्यामुळे शहरातील काही झोपडपट्ट्यात तसेच पंढरपूर जवळच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील ६ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

संगमावरील पाण्याची पातळी अडीच लाखांपर्यंत नियंत्रित ठेवण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात आज व उद्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन धरणांमधील विसर्ग वाढला तर उजनी धरणातील विसर्ग वाढवावा लागणार आहे. तसे झाले तर पंढरपूरला आणखी मोठ्या पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –