गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे असे समजत आहे. कालच एअर इंडियाने परिपत्रक काढत असे आदेश दिले आहेत की, प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर सर्व केबिन क्रू आणि काॅकपिट क्रू मेबंर्सना उत्साहात ‘जय हिंद’ म्हणणे बंधनकारक आहे. प्रत्येक फ्लाईट उड्डाणाच्या घोषणेनंतर सर्व केबिन क्रू आणि काॅकपिट क्रू मेबंर्सना एक छोटा पाॅज घेत म्हणजे काही क्षण थांबत त्यानंतर जय हिंद म्हणणे बंधनकारक आहे.
यापूर्वीही एअर इंडिया अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी २०१६ मध्ये आपल्या कार्यकाळात वैमानिकांना असे निर्देश दिले होते. लाेहानी यांच्या म्हणण्यानुसार, जय हिंद म्हटल्याने यात्रेकरूंवर याचा चांगला प्रभाव पडू शकतो. वैमानिकांनी नेहमीच आपल्या यात्रेकरूंबरोबर जोडलेले असणे गरजेचे आहे असेही त्यांचे म्हणणे होते.
लोहानी यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांनी नेहमीच आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवले पाहिजे. तसेच यात्रेकरू विमानात चढताना आणि उतरताना त्यांना नमस्कार करायला हवा. कर्मचार्यांनी नेहमीच यात्रेकरूंसोबत आदबीने वागले पाहिजे असेही त्यांचे म्हणणे होते.