चौथ्या पत्नीच्या तक्रारीनंतर NRI पतीस केली अटक, 5 व्या लग्नाच्या होता तयारीत

रोहतक : एका अनिवासी भारतीय (एनआरआय) भामट्याने एक, दोन नव्हे, तर चक्क चार महिलांची फसवणूक करून त्यांच्याशी लग्न केले. कहर म्हणजे पाचवे लग्न करताना या महाभागाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे पाचवे लग्नसुद्धा लागले असते, पण त्याच्या चौथ्या पत्नीने तक्रार केल्याने बोहल्यावर चढण्याआधीच त्याच्या हातात बेड्या पडल्या.

या महाभागाचे नाव नरेश कुमार असून एनआरआय असलेला हा व्यक्ती अमेरिकेत राहतो. तो मुळचा हरियाणाचा रोहतक येथील रहिवाशी आहे. नरेश कुमार याच्याविरोधात तीन महिन्यांपूर्वी टोहाना पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल आहे. त्याची चौथी पत्नी तक्रार देण्यासाठी पुढे आल्याने तो तावडीत सापडला. चौथ्या पत्नीने सांगितले की, माझ्यासह नरेश कुमारने चार विवाह केले होते आणि आता पाचवे लग्न तो करणार होता.

पीडित महिलेने तक्रार दाखल केल्याने या एनआरआयचे बिंग फुटले. पोलिसांनी आरोपी नरेश कुमारविरूद्ध तपास सुरू केला. नरेश कुमार अमेरिकेतून येताच टोहाना पोलिसांनी त्यास रोहतक येथून अटक केली. त्याची आता कसून चौकशी सुरू आहे.

पीडित महिला आणि नरेश कुमारची चौथी पत्नी स्वीटीने सांगितले की, गेल्या वर्षी तिचे नरेश कुमारशी लग्न झाले. लग्नाच्या 1 महिन्यानंतरच नवरा अमेरिकेत गेला. सर्व दागिनेही आपल्याबरोबर नेले. यानंतर त्याने माझ्याकडे जास्तीत जास्त पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. जेव्हा पैसे देण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा त्याने माझा फोन उचलणे बंद केले. यानंतर मला माहिती मिळाली की तो पाचवे लग्न करण्याच्या तयारीत आहे, त्यानंतर मी पोलिसांना कळवले.

टोहानाचे डीएसपी बिराम सिंह यांनी याबाबत सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून एनआरआय नरेश कुमारला अटक केली आहे. तपास सुरू आहे. आरोपीने आधीच चार विवाह केले आहेत. तर पीडित मुलगी त्याची चौथी पत्नी आहे. आता तो पाचव्यांद बोहल्यावर चढणार होता.