NRC च्या भीतीनं पश्चिम बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू : CM ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनआरसीवरुन केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. आसाममध्ये आतापर्यंत 100 जणांचा बळी गेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये एनआरसीच्या भीतीने 31 जणांचा मृत्यू झाला असा धक्कादायक दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

नादिया जिल्ह्यात आयोजित एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की भाजपशी असहमत असलेल्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपकडून सध्या सुरु आहे.

जनसमुदायाला आवाहन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की जे लोक द्वेष पसरवतात त्यांच्याशी मी कोणतंही नातं ठेवत नाही. तसेच जर तुमच्याकडे कोणी कागदपत्रं मागितली तर ती दाखवू नका. तुम्हाला आधारकार्ड जमा करण्यास सांगितले जाईल. तुमच्या कुटूंबाचा तपशील मागितला जाईल, मात्र जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणाकडेही असा दस्तावेज सादर करु नका असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. केंद्र सरकारने आणलेली नवी कररचना म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप ममतांनी केला.

राष्ट्रीय स्तरावर एनआरसी लागू करण्याचा अद्याप निर्णय नाही –
एकीकडे ममता बॅनर्जी यांनी एनआरसीवरुन केंद्रावर जोरदार निशाणा साधला असताना दुसरीकडे केंद्र सरकारने लोकसभेत एनआरसीवर नव्याने भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नमूद केले की राष्ट्रीय स्तरावर एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चंदन सिंह व नमा नागेश्वर राव यांनी विचारलेल्या प्रश्वावरील लेखी उत्तरात राय यांनी ही बाब स्पष्ट केली.