‘एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला’, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तीन वर्षापूर्वी पुण्यात झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर नुकतीच झालेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आता यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर कायमची बंदी घालावी, अन्यथा परिषद झाली तर आम्ही उधळून लावू असा इशारा भाजप युवा मोर्चाने दिला आहे. एल्गार परिषदेच्या भाषणात हिंदु धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजिल उस्मानीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भाजपने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता.

यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. आता गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने या मुद्द्यावर आपली आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर आता भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी एल्गार परिषदेवर बंदी घालण्याचे मागणीचे निवेदन विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीसांना दिले आहे भाजपयुमोने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याची शांतता भंग करणे , पुण्यामध्ये धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या एल्गार परिषदेचा खरा चेहरा शरजिल उस्मानीच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. एल्गार परिषदेवर बंदी घालावी आणि भविष्यात पुणे शहरामध्ये एल्गार परिषदेला कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.