पिंपरी : ‘हे’ दोन दिवस स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळा – आयुक्त हार्डीकर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात होत असलेल्या कोरोना वाढीच्या अनुशंगाने सर्व नागरिकांनी रविवार आणि गुरूवार या दिवशी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळावा. तसेच घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करावा; असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले आहे. तर सध्या कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा शहर कडेकोट बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अत्यंत चागले काम केले. त्यामुळे सुरुवातीला शहरात कोरोना नियंत्रणात राहिला होता. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर अशा काही शहरांतील कोरोना रुग्ण, मृतांची संख्या असा सारासार विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

मात्र, 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. 1 जूनपासून अनलॉक सुरु झाल्यानंतर रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. आठवड्यापुर्वी 150 ते 175 अशा सरासरीने रुग्णांची संख्या वाढत होती. आता गेल्या चार दिवसांत हे प्रमाण जवळपास दुपटीने म्हणजे 300 ते 315 च्या सरासरीने पुढे चालले आहे. ही शहरासाठी धोक्याची घंटा आहे.

शहरात होत असलेल्या कोरोना वाढीच्या अनुशंगाने सर्व नागरिकांनी रविवार आणि गुरूवार या दिवशी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळावा. तसेच घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी रात्री केले आहे.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय एकमुखाने घेतला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली. याच धर्तीवर पिंपरी- चिंचवडमध्येही पुन्हा एकदा कडेकोट शहर बंदचा निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे. नगरसेवकांमधून ही मागणी करण्यात येत आहे.