#Loksabha : पृथ्वीराज चव्हाणांना ‘या’ जागेबाबत नाही खात्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नगरच्या लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा सुटला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्याने काँग्रेस नेत्यांच्या मनाला लागले आहे. नगरची जागा काँग्रेसकडे असती तर जिंकलो असतो, मात्र ती राष्ट्रवादीकडे गेल्याने जिंकू की नाही माहीत नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आपली नाराजी व्यक्त केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा न सुटल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची एकप्रकारे नाचक्की झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जागेवर ताठर भूमिका घेतली नसती तर हे घडले नसते अशी काँग्रेस नेत्यांची भावना आहे. त्याचीच प्रचिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
विखे पाटील यांनी नगर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, “नगरमध्ये प्रचारासाठी विखे पाटील यांनी जावं. जर ते गेले नाहीत तर त्यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप होईल.”