Pune News : कोर्टामध्ये जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वेगवेगळ्या 7 गुन्ह्यात 37 जणांना अटक ! प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. तबल 7 गुन्हे दाखल करत 37 जणांना अटक केली आहे. यात महिलांचा देखील समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, या टोळ्यांनी हजारो आरोपींना बनावट कागदपत्रे सादर करून जामीन मिळवून दिला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लष्कर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप साखरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निलेशकुमार नंदकुमार शहाने (वय 27, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी), महारुद्र मोहन मंदरे (वय 26, माणिकबाग), असिफ ताहीर शेख (वय 27, कात्रज), मोहसीन बाबू सयद (वय 48, रा. निगडी), रशिद अब्दुल सय्यद (वय 49, रा. शांतीनगर), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय 44, चिंचवड) अशी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक संगीता काळे यांच्या तक्रारीवरून नागेश माणिक बनसोडे (वय 39, पिंपरी) याला अटक केली आहे. तसेच तिसऱ्या गुन्ह्यात खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रतीकांत कोळी यांच्या तक्रारीनुसार 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात कोणाला पकडलेले नाही. तर कोंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमेश कदम यांच्या तक्रारीवर भावेश विजय शिंदे (वय 33), विक्की विद्यासागर पुडगे (वय 28), कल्पेश सीताराम इंगोले (वय 18), सोनू अशोक जगधने (वय 29), शशांक प्रकाश साळवी (वय 31), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इतरांचा शोध सुरू आहे.
आरोपी हे या कागदपत्राद्वारे सेशन कोर्टातून जामिन देण्यासाठी 20 हजार रुपये घेत होते. तर जे.एम.एफ.सी कोर्टातून जामिनासाठी 12 हजार रुपये घेत. त्यांनी अश्या प्रकारे 80 हजार जणांना जामीन दिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात 6 महिलांचा समावेश आहे. तर 31 पुरुष आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांना न्यायालयाने 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस या घोटाळ्यात नेमक कोण-कोण आहे, याचा तपास करणार आहेत. यात काही आतमधील व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या वर्षी अश्याच प्रकारे एक प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर त्यात 4 जणांना अटक केली होती. मात्र तेच आरोपी जामीन मिळवून बाहेर आले व त्यांनी पुन्हा हेच काम करण्यास सुरुवात केली. आता देखील 37 जणांना अटक केले त्यात त्यांचा समावेश आहे.

आरोपी नेमकं काय करत…
शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून ते सादर करत असे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, आणि सातबारा उतारे हे बनावट तयार केली जात. ती जामिनासाठी न्यायालयात सादर केली जात. तर काही प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तारखेला न्यायालयात हजर राहणार नाहीत, अश्याना एजंटमार्फत बोगस जमीनदार मिळवून देत. यात न्यायालयाची दिशाभूल तर होत असतच पण त्यामुळे गुन्हेगारांचे फावत होते. यामुळे पोलिसांनाच याचा त्रास सहन करावा लागत. कारण, बहुतांश हे सराईत आणि घरफोडी, चोऱ्या करणारे आरोपी असत. जे एकदा जामीन भेटला की नंतर ते कधीच न्यायालयात तर येत नसत. पोलिसांच्या देखील हाती लागत नव्हते. त्यांची गुन्हेगारी कृत्ये मात्र सुरूच राहत होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना या रॅकेटबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक बहिरट, विनायक गायकवाड यांच्या दोन टीम केल्या. त्यात नवीन आलेले 12 उपनिरीक्षक आणि कर्मचारी यांची पथके केली. त्यांना योग्य मार्गदर्शन करत अचानक छापेमारी करत कारवाई केली. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.