पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग; शंकाही दूर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या भयान संकटात गेली 40 ते 42 दिवस सदैव रस्त्यावर उभा राहून काम करणाऱ्या शहर पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. तसेच त्यांच्या मनातील शंका देखील दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पोलिसांसाठी प्रथम पुण्यात सुरू झालेला भावनिक प्रज्ञावंत वर्ग आता राज्यात देखील सुरू करण्यात आला आहे. चार वर्षांपासून हे वर्ग सुरू आहेत. पोलिसांनी ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसोबत कसे वागावे, त्यांच्या समस्या काय आहेत तसेच पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. तसेच, बंदोबस्त करताना येणारा ताण हलका कसा करावा, याची माहिती दिली जाते.

देश सध्या कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत, ते पोलीस. गेल्या दीड महिन्यापासून पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भावनिक प्रज्ञावंत वर्गाचे नियमित केले जाणारे आयोजन सध्या बंद आहे. पोलिस आयुक्तालयात दररोज शंभर पोलिसांच्या गटाला मार्गदर्शन करण्यात येते. पण, आता एकाच वेळी शंभर पोलिस कर्मचारी आयुक्तालयात एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी खास व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ वीस मिनिटांचे असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते शहरातील प्रत्येक पोलिसाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कपील पवार, पोलिस नाईक तानाजी सरडे, ज्ञानेश्वर दुसंगे यांनी हे व्हिडीओ तयार केले आहेत. या माध्यमातून सरडे हे सध्या पोलिसांना बंदोबस्तात जाणवणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत दहा विषयांवरील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. बंदोबस्तावर ताण, भीती, नैराश्य पोलिसांना जाणवत आहे.

 

मी स्वत: भावनिक प्रज्ञावंत अभ्यासक्रम केला आहे. विविध विषयांवरील पुस्तके वाचली आहेत. त्याचा मला फायदा झाला. पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लॉकडाउनमध्ये हे खास व्हिडीओ तयार केले आहेत. पोलिसांच्या भावना समाजावून घेणे, त्यांना सामाजिक अंतर पाळण्यास सांगणे, स्वच्छता, स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे या तानाजी सरडे यांनी सांगितले.