पंतप्रधान का शांत आहेत, सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली ? : राहुल गांधी

पोलिसनामा ऑनलाईन – सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोर्‍यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवाण खोर्‍यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?, असा सवाल राहुल गांधी मोदींकडे उपस्थित केला आहे.

गलवाण खोर्‍यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे 17 जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर 17 असे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झाले. काय घडले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे 1975 मध्ये चीनच्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुमारे साडेचार दशकांनंतर भारत-चीन सैन्याच्या संघर्षांत ही जीवितहानी झाली आहे.