… म्हणून राहुल गांधी दोन्ही ठिकणी पराभूत होतील : पियुष गोयल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांनी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणावरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी देशातील १३० कोटी जनता भाजपसोबत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

पियुष गोयल हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणूकीत राहुल गांधी शेजारील देशातील मतदारसंघात जावे लागेल असा टोला त्यांनी मारला. ‘चौकीदार चोर है’ यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना आधीच नोटीस बजावली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवरा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे १० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.

मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ त्यामुळे त्यांना निवडूण द्या, असे अंबानी यांनी म्हटले आहे. यावर बोलताना पियुश गोयल म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असला तरी देशातील १३० कोटी जनता भाजप बरोबर आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.