राजेश मारू मृत्यूप्रकरणी रूग्णालयासह राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

जानेवारी महिन्यात मुंबईतील नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारू  या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजेशच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी रुग्णालय, मुंबई महापालिका व राज्य सरकारला एक आठवड्यात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच रुग्णालय व पालिका प्रशासनाने पुढील तारखेपर्यंत दुर्घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तसेच सर्व अहवाल व दस्तावेज जपून ठेवावेत, असा आदेशही न्या. शंतनू केमकर व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने दिल्याने रूग्णालय प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8cccb128-bc84-11e8-8261-d1cdf278664b’]

रुग्णालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाने आम्ही आमचा माणूस गमावला आहे. राजेश हा आमच्या घरात मुख्य कमावता माणूस होता. त्याच्या अशा जाण्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तर उभा राहिलाच आहे, परंतु आम्हाला खूप मानसिक व भावनिक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश रुग्णालयाला द्यावेत, अशी विनंती मारू कुटुंबियांनी याचिकेत केली आहे. राजेशची बहीण लीना मारू  तसेच आई वडिलांनी मिळून ही याचिका केली आहे. दरम्यान, पालिकेने याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने एप्रिलमध्ये दिलेल्या अहवालात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर स्पष्ट ठपका ठेवला आहे. त्यानंतर तो अहवाल मिळण्यासाठी माहितीच्या अधिकारात वारंवार विनंती करूनही रुग्णालयाने टाळाटाळ केली, असा आरोपही कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे.

धक्कादायक.. २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचार

२७ जानेवारी रोजी राजेश हा नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या असलेल्या सासूला पाहण्यासाठी आला होता. सासूला एमआरआय चाचणी करण्यासाठी एमआरआय केंद्रात आणण्यात आले होते. तेव्हा तिथे राजेशसोबत अन्य काही नातेवाईक होते. त्यावेळी आया सुनीता सुर्वेने सर्वांना अंगावरील धातूचे सर्व सामान काढून ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी काढले. त्यानंतर वॉर्डबॉय विठ्ठलने राजेशला ऑक्सिजन सिलिंडर आत नेण्याचे काम सांगितले. तेव्हा, सिलिंडरही धातूचाच असल्याचे काहींनी सांगितले. मात्र, एमआरआय मशीन बंद असल्याने काही होणार नाही, असा दावा विठ्ठलने केला. मात्र, प्रत्यक्षात मशीन चालूच होती. त्यामुळे सिलिंडरसह आत शिरताच प्रचंड चुंबकीय शक्तीमुळे राजेश मशीनमध्ये खेचला गेला. त्याचा हात मशीन व सिलिंडरमध्ये अडकला आणि त्याचवेळी ऑक्सिजन बाहेर येऊन नाकातोंडात प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन जाऊन त्याचा देह निळा पडला आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी राजेशच्या मेहुण्याने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. फेब्रुवारीमध्ये कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर मार्चमध्ये मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत मारू कुटुंबियांना देण्यात आली.