पुरावा द्या अन्यथा माफी मागा; नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपवरून भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर धक्कादायक आरोप केला आहे. राज्य सरकारने १६ कंपन्यांना रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत विचारणा केली. त्यावर महाराष्ट्राला औषधी न देण्याचं केंद्राकडून सांगण्यात आल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर केला. या आरोपावरून आता भाजपने प्रत्युत्तर दिल आहे.

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन भूमिका मांडावी, अशा प्रकराचे निराधार आरोप करण्याऐवजी नवाब मलिक यांनी पुरावा द्यावा नाहीतर माफी मागावी. असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांच्या आरोपावर पलटवार केला आहे. परिस्थिती बिकट असून, महाविकास आघाडी सरकारने दोषारोपाचे खेळ थांबवावेत आणि करोना परिस्थिती हाताळावी. ही जर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढे यावं आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अन्यथा अशा प्रकारचे निराधार आणि बेजबाबदार आरोप करण्यापासून आपल्या मंत्र्यांना थांबवावं, अशा शब्दात उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी म्हटलं होत की, हे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. महाराराष्ट्र सरकारने जेव्हा १६ कंपन्यांना रेमडेसिवीरची निर्यात करायला सांगितलं, तेव्हा ‘आम्हाला केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधी पुरवू नका असं सांगितलं आहे,’ अशी माहिती कंपन्यांनी दिली आहे. जर औषधांचा पुरवठा केला नाही, तर परवाने रद्द करू असा इशारा आता या कंपन्यांना देण्यात आलेला आहे. हा धोकादायक पायंडा असून, या परिस्थितीत औषधांचा साठा जप्त करून गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणताही पर्याय नाही,असे नवाब मलिक यांनी म्हटलं होत.