एकदा तुमचे संस्कार, संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकाला आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपाने त्याचे शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावे, पण मराठी उद्योजकाने या माणसाच्या दहशतीखाली आत्महत्या केली, त्याचाही कायद्याने तपास करायचा नाही काय? मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणे हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसे असेल तर या नटीबाईची भाजपा कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी ! एकदा तुमचे संस्कार व संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तसेच ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा ? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

सामना अग्रलेखातील ठळक मुद्दे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ब-याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले.

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला.

महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत.

हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात? विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या.

हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.

कायद्याची चौकट मोडू नये. त्या चौकटीत सगळ्यांना बसवायचे आहे. फेकूचंदांनी हे समजून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत निर्णय दिले. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असेल तर विधिमंडळाबाहेर सरकारविरोधी नृत्यालाप करून काय होणार?

विरोधकांचे म्हणणे असे की, सरकारविरुद्ध कुठे काही बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, हा आरोप गंभीर आहेच, शिवाय राज्याच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा आहे. मात्र या आरोपाचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनीच द्यायला हवे. हे प्रकार घडत असतील तर त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. पण कोणी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर दारूच्या गुळण्या टाकत असेल तर त्या उपटसुंभांना सोडताही कामा नये.

फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांना आणीबाणीविषयी फारच प्रेम आहे. कुठे काही झाले की ते आणीबाणीच्या नावाने अश्रू ढाळू लागतात. आणीबाणीत नागरिकांचे अधिकार व लोकशाही संस्थांची सुरक्षाच धोक्यात आली होती. ‘मिसा’चा वापर मनमानी पद्धतीने विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी होत असल्याचा आरोप जयप्रकाश नारायण वगैरे मुख्य नेते करीत होते व पुढे जयप्रकाश नारायणही त्याच ‘मिसा’चा बळी ठरले.

चौकशीला घाबरायचे कारण नाही व हे सर्व सूडाचे राजकारण आहे, असे बोंबलायची गरज नाही. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत ‘ईडी’सारख्या केंद्रीय संस्था जो छळवाद करीत आहेत त्यावर भाजपा पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदम हरिश्चंद्री थाटाच्या आहेत, काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कारण काय? असे सल्ले दिले जात आहेत. तेच सल्ले सरकार विरोधकांनाही लागू पडतात.

व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचे कारण काय?
जलयुक्त शिवार योजना, बीएचआर सोसायटी घोटाळा, मुंबै बँक, आधीच्या सरकारची रस्ते कंत्राटे याबाबत व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचे कारण काय? शेणात तोंड बरबटले असेल तर कायदा काम करीलच व कायद्याने काम केले तर आणीबाणी आली असे बोंबलायचे. हा काय प्रकार आहे?

शेतकरी देशद्रोही आहेत, ते नक्षलवादी आहेत, त्यांना पाकिस्तान-चीनकडून अर्थपुरवठा होतो, असे बोलणे ही आणीबाणीचीच संस्कृती आहे. आणीबाणी पर्वात जयप्रकाश नारायण यांनाही देशद्रोही ठरवलेच होते. एकदा तर ‘जयप्रकाश हे देशद्रोही असून आंदोलनासाठी बाहेरून धन गोळा करतात’, असा आरोप केला गेला होता.