शिवसेना खासदार विनायक राऊतांचा जोरदार पलटवार, म्हणाले – ‘नारायण राणेंना कावीळ झालीय, पनवती म्हणून भाजपने त्यांना अडगळीत टाकलंय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकल आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. राणेंनी कोकणात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी दिला आहे. सिंधुदुर्ग भवन कस बनलं. कोकणवासीयांना फसवून भूखंड कसा लाटला हे आम्ही लोकांना सांगणार असल्याचे राऊत म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकले आहे. त्यांना कावीळ झाली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयातच RT-PCR चाचणीसाठी जादा पैसे घेतले जात आहेत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे अशी टीका राऊतांनी केली आहे. मातोश्रीत शांती यज्ञ घालण्याचा सल्ला राणेंनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा अन् मातोश्री ही दैवतांची घरे असून त्यावर बोलणे त्यांना शोभत नसल्याचे राऊत म्हणाले.