सोलापूर जिल्ह्यातील थकीत FRP साठी शिवसेनेचे धरणे आंदोलन, साखर संकुलाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देत आहेत. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मात्र, शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत आहे, आसा आरोप करत शिवसेनेने सोमवारी साखर संकुलसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली.

सोलापूर जिल्हा शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोहोळ तालुका शिवसेना प्रमुख अशोक भोसले, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या आंदोलनाची साखर आयुक्त‌ शेखर गायकवाड यांनी तात्काळ दखल घेवून आंदोलकांच्या‌ शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले.

यावेळी शिष्टमंडळाने “सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसाची एफ.आर.पी. त्वरीत शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून १४ दिवसात ऊसाच्या एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरीत द्यावे, शेतकऱ्यांचे मागील २ वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरीत मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, आदी मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले. यावेळी साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, उत्तम इंदलकर, साखर सह संचालक डॉ संजयकुमार भोसले, मंगेश तिटकारे, राजेश सुरवसे आदी उपस्थित होते.

या बाबत नागेश वनकळसे म्हणाले, सांगली, कोल्हापूर येथील कारखान्यांनी उसाची एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीची रक्कम द्यावी अशी आमची मागणी आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेणार आहोत. साखर आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. पहिली उचल देऊन राहिलेल्या एफआरपीची रक्कम म्हणून तेवढ्या किमतीची साखर शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन आयुक्तांनी केली आहे, याबाबत आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून भूमिका ठरविणार आहोत.

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एफआरपीच्या रक्कमेसाठी धरणे आंदोलन करीत मागण्यांचे निवेदन दिले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांनी एफआरपीनुसार पहिली उचल दिली आहे, तशीच सोलापूरच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांनी जास्तीत जास्त रक्कम पहिली उचल म्हणून द्यावी असा आमचा प्रयत्न आहे.
शेखर गायकवाड -साखर आयुक्त.