निवडणुकांच्या प्रचारातील गर्दीवरून शिवसेनेचा टोला, म्हणाले – ‘समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढार्‍यांना वाटतंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने कहर केला आहे. बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ आहे. त्यामुळे राज्यसरकारने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या प्रचारसभेत होणाऱ्या गर्दीवरून हे निर्बंध अपवाद आहे की काय असे वाटू लागले आहे. पश्चिम बंगालात सुरु असलेली निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही शिवाय गर्दीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेथे त्या गर्दीत कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते. आणि इकडे महाराष्ट्रात पोटनिवडणुकीत पंढरपूर येथे विना मास्कवाल्यांची गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही स्वतःच्या नाकातोंडावरील ‘मास्क’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागले आहे. अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून जोरदार टीका केली.

काय म्हटलंय आहे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात?
फेब्रुवारी २१ मधील दुसऱ्या लाटेत ८ हजार ५७९ या निचांकी रुग्णसंख्येवरून फक्त ६२ दिवसांत एक लाखाचा आकडा गाठला गेला आहे. त्यावरूनही कोरोनाच्या दुसऱया लाटेचा वेग किती भयंकर आहे याचा अंदाज येतो. एवढेच नव्हे तर तज्ज्ञ मंडळी पुढील १५ दिवसांत या लाटेचा कहर खऱ्या अर्थाने दिसेल, असा धोक्याचा इशाराच देत आहेत. या सर्व भयंकर शक्यतेचा विचार करून कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांनाच सज्ज व्हावे लागेल. ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत शिरावे लागेल. आरोग्य व्यवस्थेवरील ताण हा चिंताजनक आहे. एखाद्या युद्धप्रसंगी शेवटी जनतेलाच सैनिक बनून शत्रूशी लढावे लागते तसे हे ‘युद्ध’ सुरू झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत समोरची विनामुखपट्टय़ांची अतिउत्साही गर्दी पाहून स्वतःच्या नाकातोंडावरील ‘पट्टी’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. बहुतेक पुढाऱयांना समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते. ‘‘पंतप्रधान मोदी, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय? कोण आहात तुम्ही?’’ असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. परमेश्वराचे अवतार मोदी हे नक्कीच नाहीत. तसे असते तर त्यांनीही जादूच्या छडीने छुमंतर करून कोरोनाचा पराभव केला असता, पण आपण सत्तेवर विराजमान झालेले एक साधारण मनुष्यप्राणीच आहोत याचे भान ठेवून मोदी यांनीही कोरोनाच्या दुसऱया लाटेशी लढण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याबद्दल ज्यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय चिंता वाटते त्यांनी महाराष्ट्राने लसीकरणाबाबत केलेल्या विक्रमाचीही नोंद घ्यायला नको काय? शनिवारी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली याबद्दल महाराष्ट्राची पाठ दिल्लीश्वरांना थोपटावीच लागेल. कोरोनाचा कहर फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात आहे. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रेसिंग’चा पाठपुरावा केला तर अनेक राज्यांत कोरोना आकडय़ांचा कडेलोट होईल, पण जेथे निवडणुका आहेत तेथे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोविड-कोरोनाचे नाव काढायचे नाही असे जणू आदेशच सरकारी यंत्रणांना मिळालेले दिसतात.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत सध्या कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. या शहरांनी वेळीच निर्बंध स्वीकारले असते तर नक्कीच आकड्यांची घसरण दिसली असती. येथे सरकार कमी पडते आहे, असे नाही. उलट कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे लक्षात घेऊन मुंबईसह राज्यभरात ‘जम्बो’ आरोग्य व्यवस्था उभी केली जात आहे. सरकार या महामारीला रोखण्यासाठीच हे सगळे करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे राज्यात लागू केलेले कडक निर्बंध आणि सप्ताहाअखेरचे लॉकडाऊन.