सुशांत सिंहच्या मृत्यूवरून ‘बोंबाबोंब’ ! स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत एक शब्दही नाही, खा. राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. तेव्हा सुशांत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नारायण राणे यांनी चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्येसंदर्भात चकार शब्द कधी काढला नाही, ती हत्या कोणी केली, असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

विनायक राऊत म्हणाले, “नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत व त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्यासाठी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची हत्याची झाल्याचे ठामपणे त्यावेळी सांगितले. पण मला एक त्यांना विचारायचं आहे, नारायण राणे यांचा चुलत भाऊ अंकुश राणे यांची जेव्हा हत्या करण्यात आली ती कोणी केली? त्याबाबदल अजून चकार शब्द काढलेला नाही. स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली तरी चालेल, त्याबाबत ब्र देखील काढायचा नाही. पण सुशांत सिंहमागे टाहो फोडून रडायचं” असे म्हणत “कणकवलीत २००५ पासून किती हत्या झाल्या, त्याचा तपास करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे” राऊत यांनी सांगितलं.

तसेच सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव कधी नोंदवलं गेलं नाही. निलेश राणे यांनी कधी शोध लावला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वेगळे आदेश येतील. तेव्हा महाराष्ट्र सरकार योग्य कारवाई करेल, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले. नारायण राणे यांनी टूर-टूर करत राहावी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे पूर्ण करेल, असा टोला सुद्धा राऊत यांनी लावला.