‘सोनिया गांधीच युपीएच्या प्रमुख; संजय राऊत ठरवणारे कोण?

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युपीएतील संभाव्य बदल आणि नेतृत्व या विषयावर भाष्य केले होते यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना फटकारले होते. तर आता मात्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसशिवाय युपीए पूर्ण होऊ शकत नाही आणि सोनिया गांधी याच युपीएच्या नेत्या असतील. संजय राऊत काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांना सुनावले आहे. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

युपीए बाबत राऊत यांच्या वक्तव्यावरून थोरात म्हणाले, काँग्रेस असल्याशिवाय युपीए पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सध्या कठीण दिवस असतीलही परंतु एक ना एक दिवस काँग्रेसचाच येणार आहे. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता काँग्रेसच्या नेतृत्वात आहे. युपीएचे नेतृत्वसुद्धा सोनिया गांधीच करतील. यासंबंधी राऊत काय म्हणतात यावर नेतृत्व ठरणार नाही. देशात अनेक नेते आहेत, काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. हे सर्व नेते ठरवतील तो निर्णय होईल. त्यामुळे राऊत काय म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.’ असे ते म्हणाले, त्यावेळी थोरात हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याने यानिमित्त संगमनेरमध्ये झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी सापडलेले स्फोटके, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृहमंत्र्यावर झालेले आरोप याबाबत बोलताना थोरात म्हणाले, ‘सरकार या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालत नाही. यामुळे सरकार अडचणीत येईल, असे मला तरी वाटत नाही. गृहमंत्र्यांवरही आरोप झाले. त्यांनी स्वत:च चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे यामागील सत्य काय आहे, हे लवकरच पुढं येईल. हा एक कटकारस्थानाचा भाग असून याला बळी पडून काही अधिकारी आरोप करीत आहेत का, हेही चौकशीत स्पष्ट होईल. रश्मी शुक्ला यांच्या अहवालाची वस्तुस्थिती मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीतून उघड झालीच आहे. मुख्य सचिव कोणी राजकीय व्यक्ती नाही. त्यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवलाच पाहिजे. असेही थोरात यांनी म्हटले आहे.