मोठी बातमी ! राज्यात कडक Lockdown लागू होणार? दोन दिवसांत मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, ही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तसेच त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कोरोना परिस्थिती आणि त्यानंतर लॉकडाऊनबाबत भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत. मात्र, ते पुरेसे नसून, कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात आहे. लोकांमधून 100 टक्के सर्व बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील. कडक लॉडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील’. तसेच ‘दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला असून, त्याबाबत माहिती मागितली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही ही कदाचित लॉकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येतील. राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित असा फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण आता संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तीन आठवड्यांचा लॉकडाऊन

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कडक लॉकडाऊनबाबत वक्तव्य केले.