परमबीर सिंगांवर पोलिस निरीक्षकाचे धक्कादायक आरोप, म्हणाले – ‘नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी तर कारवाई न करण्यासाठी 50 लाखाची मागणी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी १०० कोटीची मागणी केल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. संपूर्ण रविवार या लेटर बॉम्बमुळे गाजत असताना गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकड़े तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी पबवर केलेल्या कारवाईच्या रागात आपले निलंबन केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. त्याचबरोबर निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अपर मुख्य गृहसचिवांकडे २ फेब्रुवारी रोजी डांगे यांनी याबाबतची लेखी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार, २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री उशिरापर्यंत गावदेवी परिसरात सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर कारवाई केली होती. कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने कारवाईस विरोध करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरचे संबंध आहेत’ असे सांगितले होते. तसेच त्याच्या अन्य दोन मित्रांनी पोलिसांना दमदाटी करत मारहाणही केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत या तिघांनाही गावदेवी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, त्यानंतरही तिघांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हाच गुन्हा मागे घेण्यासाठी वरिष्ठांचा दबाव वाढला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद आहे. अशात यात दुसरा गुन्हा दाखल केला.

या सर्व प्रकारानंतर एसीबीच्या कार्यालयातून २५ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंग यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला. मात्र याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना या संदर्भात सांगितले. त्यावेळी त्यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळविण्यात आले. त्यानंतर आयुक्त पदाचा परमबीर सिंग यांनी पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ १८ जुलै रोजी माझे निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० तर कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप यात केला आहे. तसेच यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही नमूद करत यात, त्याने जितेंद्र नवलानी, भरत शाह, राजीव भरत शाह आणि अन्य संबंधितांबाबत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सखोल चौकशी करण्याची तसेच परमबीर यांचे त्यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनची व दाखल गुन्ह्यांबाबतही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आकसातून परमबीर सिंग यांनी केली कारवाई
आयुक्त पदाचा परमबीर सिंग यांनी पदभार स्वीकारताच, पाहिल्यादा त्यांनी आपली विभागीय चौकशी सुरु केली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली करत पाठोपाठ निलंबन केले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाख तर कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे.