विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या एकाला कोंढवा पोलिसांनी सोलापूरातून अटक केली आहे.

नईम मियालाल पटेल (४७, सध्या समाधान नगर सुत मिलच्या पाठीमागे सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणात नईम पटेल हा तेव्हापासून फरार होता. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे व पोलीस नाईक क्षीरसागर यांनी त्याचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती काढली. त्यावेळी तो सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोलापूर पोलिसांशी समन्वय साधला आणि पडताळणी करून त्याला सोलापूरमधून ताब्यात घेतले. यासाठी सोलापूर येथील चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश सावंत यांची मदत झाली.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे, पोलीस नाईक क्षीरसागर व इतरांच्या पथकाने केली.