बारावी झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र यंदाच्या वर्षी पासून बंधनकारक केले आहे. याचमुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थी पालकांचा बराच गोंधळ आणि धावपळ सर्वत्र पाहायला मिळाली होती. इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र यावर्षी वेळेत सादर करता न आल्याने खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागला असल्याचेही समोर आले. म्हणूनच विद्यार्थी व पालकांची ही हेळसांड थांबवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापुढे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी, उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्ण पडताळणी होऊन प्रमाणपत्र मिळण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. अनेकदा यासाठी आणखी वेळ होऊन विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये प्रमाणपत्र प्रवेश घ्यायच्या संस्थांमध्ये सादर करणे अवघड होते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांतील विद्यार्थ्यांनी 10 वी पास झाल्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेतेवेळीच आपला जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज ऑनलाईन भरण्याच्या सूचना केल्या आहेत.