विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २० आणि २२ फेब्रुवारी रोजी विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे गहू, हरभरा याबरोबरच मोसंबी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. भोकरदन तालुक्यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या सुमारास गारा पडल्या. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपलं आहे. गारपिटीनं गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पिकांचे नुकसान
अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस पडला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अनेक भागात रात्री 2 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, कांदा, संत्रा पिकांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.

सतर्कतेचा इशारा
या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करुन शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळं मैदान, झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणं टाळावं, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.