वाशिष्ठी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

पोलिसनामा ऑनलाईन – चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. चिंचनाका परिसरात 3 फूट पाणी असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गासह काल रात्रभर कोसळणारा पावसामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले आहे. त्यामुळे बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे.

सांस्कृतिक केंद्राला पुराचा वेढा पडला आहे. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली आहे.