पुरंदर विमानतळासंदर्भात माजी राज्यमंत्री विजय शिवतारेंनी लिहीलं शरद पवारांना पत्र, म्हणाले…

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदरच्या नियोजित विमानतळाची जागा बदलण्यास शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी विरोध केला आहे. शिवतारे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. पारगाव वगळून विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करा आणि बाधितांना द्यावयाचा मोबदला तात्काळ जाहीर करा. मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील अशी मागणी शिवतारे यांनी शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

राजुरी, रीसे पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावात विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नसल्याने जागा बदलास आपला विरोध असल्याचे शिवतारे यांनी पत्रात नमूद केले आहे. हे पत्र आज प्रसिद्धीला दिले आहे. गायरान जमिनी दोन्ही ठिकाणी किरकोळ स्वरुपात आहेत. वन जमिनीसुद्धा फार नाहीत. याउलट जुन्या गावांमध्ये 2001 पासून आजपर्यंत जवळपास 3500 एकर जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत. म्हणजेच बाहेरून आलेल्या भांडवलदार लोकांनी किंवा व्यावसायिकांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, याकडे शिवतारे यांनी शरद पवार यांचे लक्ष्य वेधले आहे.

समृध्दी महामार्गाचे जिवंत उदाहरण
समृध्दी महामार्गाचे आपल्यासमोर जिवंत उदाहरण असल्याचे सांगत शिवतारे म्हणाले, समृध्दी महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. पण शासनाने मोबदला जाहीर केल्यानंतर त्याच शेतकऱ्यांनी स्वत: पुढे येत शासनाला स्वखुशीने जमिनी दिल्या. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतही शासनाने मोबदला जाहीर केल्यास आणि तो समाधानकारक असल्यास शेतकरी मोठ्या मनाने सकारात्मक होतील, असे शिवतारे यांनी म्हटले आहे.

यशवंतरावांनाही विरोध चुकलेला नाही
शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात विजय शिवतारे यांनी यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली. उजनी धरण उभारताना शेतकऱ्यांनी आणि विशेषत: वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण यशवंतरावांनी मनोमन पांडुरंगाची माफी मागितली आणि धरण पूर्ण केले. पुढे याच उजनी धरणाने संबंध पश्चिम महाराष्ट्राचे चित्र पालटल्याचे शिवतारे यांनी पत्रात नमूद केले. परुंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी तेवढा त्रास माझ्यासहीत आपल्यालाही सहन करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.