‘पहिल्यांदाच छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेत संधी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता भाजपने तिसरे नाव जाहीर केल्याने एकनाथ खडसे आणि सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भागवत कराडांच्या रुपाने पहिल्यांदाच छत्रपतींच्यासोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, भागवत कराड हे जनतेपर्यंत पोहचणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या या निवडीबाबत आनंद होत आहे. तसेच पहिल्यांदाच छत्रपींच्यासोबत वंजारी समाजाच्या नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली असून, यातून एक चांगला संदेश जाणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रात सात जागा असून या जागांसाठी मार्च अखेर निवडणूक होणार आहे. भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरीत चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. भाजपने उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावे यापूर्वीच निश्चित केली होती. मात्र, तिसऱ्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तिसऱ्या जागेसाठी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली.