“अगर गुरु ऐसा हो , तो शिष्य कितना निकम्मा निकलेगा”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही सॅम पित्रोदा यांच्यावर टीका केली आहे. सॅम पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांना देशाची समज नाही तेच लोक असं वक्तव्य करतात, अशी टीका जेटलींनी केली आहे.

सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. जर गुरु असा असेल, तर शिष्य किती निष्क्रिय असेल. असा टोला यावेळी अरुण जेटलींनी लगावला. आम्ही केलेले दोन्ही ऑपरेशन यशस्वी राहिले आहे. आधी देशात घुसून दहशतवादी हल्ले करणाऱ्यांवर कारवाई व्हायची. पण आता जिथून दहशतवादाला सुरुवात होते तिथेच कारवाई केली जात आहे, असं अरुण जेटलींनी सांगितलं. सॅम पित्रोदा आज पाकिस्तानच्या टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असतील, असा टोलाही जेटलींनी लगावला. कोणताही सामना बॅकफूटवर खेळत जिंकला जाऊ शकत नाही असं सांगताना देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही फ्रंट फूटवर आहोत, असं अरुण जेटली यांनी म्हटलं. जर गुरु असा असेल तर शिष्य किती बिनकामी असेल, त्यांच्यामुळे देशाला भोगावे लागत आहे,  अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, पित्रोदांनी भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेला एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भारताने खरंच असा हल्ला केला का ? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले ? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता, तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकलो असतो. पण मला ही भूमिका पटत नाही, असे पित्रोदा यांनी म्हटलं होते.