राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार ? अजित पवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

पुणे : राज्यासह देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने दुसर्‍या लाटेच्या शक्यतेने चिंता व्यक्त होत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीचे कर्फ्यु जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा कर्फ्यु लागू होणार का, अशी चर्चा रंगलेली असताना राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आणि स्थिती पाहून पुढील निर्यण घेतले जातील. तसेच, त्यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यताही नाकारली नाही.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर अजित पवार पत्रकांरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना म्हटले की, अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आणखी 10 ते 15 दिवस स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि नंतर पुढील निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.

लॉकडाऊनवर काय म्हणाले…
अजित पवार म्हणाले, कशा प्रकारची स्थिती समोर येईल, यावर सर्व अवलंबून असल्याने आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही. मी आज काही बोललो तर लोक जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असेल.

अधिकार्‍यांना दिल्या सूचना
सर्व अधिकार्‍यांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर वेळ पडल्यास पुन्हा तातडीने सुरू करता येईल. या अगोदर व्हेंटिलेटर बेड, साधे बेड खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, गरज पडल्यास या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सुविधा उपलब्ध केल्या जातील.

अजून लस नाही, काळजी घ्या
लोकांना खबरदारीचे आवाहन करताना अजित पवार म्हणाले, कोरोना व्हायरसवर अद्याप बाजारात लस आलेली नाही. आज लस येईल, उद्या लस येईल अशा रोज बातम्याच ऐकतोय, इथं माणूस मरायला टेकला आहे. यांची लस अजून यायला तयार नाही. अजून लस आलेली नसल्याने लोकांनी खबरदारी बाळगावी. योग्य ती काळजी घ्यावी.

आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री बोलणार

कोरोना पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकार अलर्ट झाले असून त्याबाबत हालचालींना सुरूवात झाली आहे. यासाठी आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.