ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे.., राज्यपालांचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो रुग्ण सापडले असून हजारो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या काळात काही महिन्यांपासून दुकाने आणि उद्योग बंद होते. पण आता अनलॉकच्या प्रक्रियेत अनेक अटी शर्थींसह उद्योग-धंदे, बार-रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरंही उघडण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करता येणार नाही असं स्पष्ट केले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं सुरू करण्याबद्दल सूचना केली आहे.या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली.’ अशी आठवण देखील राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. तुम्ही 11 ऑक्टोबरला कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रामध्ये राज्यपालांना आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’ असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लावला आहे. ‘Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ मंदिर उघडल्यानेच हिंदुत्व आणि न उघडल्यास सेक्युलर असे म्हणणे योग्य आहे का ?त्यामुळं आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा खोचक प्रश्न देखील राज्यपालांना विचारला.

दरम्यान, आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिन्ही पत्रे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असणे केवळ योगायोग आहे का ? असा टोलादेखील राज्यपालांना लगावला.