उत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा काल उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश मधील या अमानुष घटनेवर अभिनेता अक्षय कुमार याने संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणार्‍यांना कुठलीही दया माया न दाखवता थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

आपले कायदे आणखी कठोर झाले पाहिजेत. शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत. या दोषींना फाशी द्या. देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवा. आपण किमान एवढे तर नक्कीच करु शकतो. अशा आशयाचे ट्विट करुन अक्षयने संताप व्यक्त केला आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रनौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती.

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून, मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर काल तिची प्राणज्योत मालवली.