जिल्हा कारागृहातून 3 कैद्यांचे पलायन, जळगावमधील घटना

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव इथल्या जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज (दि.25) शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तीन संशयितांमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा देखील समावेश आहे, असे समोर आले आहे.

सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील (रा. तांबापुरा, अमळनेर) व सागर संजय पाटील (रा. पैलाड, अमळनेर) अशी कारागृहातून पळालेल्या आरोपींची नावे आहेत.

कारागृहात दररोज सकाळी कामांसाठी ज्याप्रमाणे आरोपींना सोडले जाते. तसेच आज शनिवारी देखील आरोपींना सोडले होते. मात्र, यावेळी सुरक्षारक्षकांची नजर चुकवून हे तिघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, कारागृहात आत आणि बाहेर अशी दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना आरोपी पळाले कसे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज दुपारी कारागृहास भेट देणार आहेत.

सुशील मगरे हा काही दिवसांपूर्वीच पोलीस दलातून बडतर्फ झाला आहे. पुण्यातील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने सहकार्‍यांच्या मदतीने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर 2019 मध्ये बडोदामधून अटक केली होती. त्यानंतर तो येथील जिल्हा कारागृहात होता.

जळगाव कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जळगावच्या कारागृहात जर कैदी पळून जात असतील तर तेथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे? याचा अनेकांना अंदाज आला असेलच. जे तीन कैदी कारागृहातून पळाले आहेत. त्यांना कोणी मदत केली का? असाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. जळगाव इथल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर आहे का? असे प्रश्न आता जळगाव कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत उपस्थित होत आहेत. कैद्यांना कैद्याप्रमाणे ठेवण्यासाठी कारागृहे बनविली असताना जर कैदी यातून पळून जात असेल तर तेथील अधिकारी आणि कर्मचारी हे काय करत होते?.कारागृहात विविध गुन्हे केलेले कैदी ठेवले जात आहेत. असेच प्रकार जर कारागृहात घडत राहिले तर कारागृह हे कारागृहप्रमाणे राहिल का? असाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर आता जळगाव कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रत्येक कारागृहाची सुरक्षाव्यवस्था ही कडक आणि उत्तम असायला हवी. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कारागृह परिसरात सीसीटीव्ही लावले होते की नाही? की त्या कैद्यांना पळून जाण्यासाठी तेथील कोणी मदत केली आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.