सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात ; ४ ठार, २५ जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सप्तशृंगी गड येथे देवीचा नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने थांबलेल्या गाडीवर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ युवक ठार झाले असून अन्य २५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात दिंडोरी तालुक्यातील वणी नजीकच्या कृष्णगावाजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.

सागर अशोक ठाकूर (वय २३), कुणाल कैलास ठाकूर (वय २५), गणेश भगवतीप्रसाद ठाकुर (वय ३०, सर्व रा. वणी), आशिष माणिक ठाकूर (वय ३०, रा. त्र्यंबकेश्वर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

सप्तश्रृंगी गडावर नवसपूर्तीसाठी काही भाविक रविवारी गेले होते. तेथून रात्री उशिरा ते नाशिकला परत निघाले होते. वणी कृष्णगावजवळ त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने गाडी रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली. यावेळी काही जण गाडीतून उतरत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेत चार जण जागीच ठार झाले. इतर २५ जण जखमी झाले. अपघातातील सर्व जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.