धरणातील पाणी उपशावरून २ गटात तुफान हाणामारी ; दगडफेकीत २० शेतकरी जखमी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – घोड धरणातील पाणी उपशावरून वडगाव शिंदोडी व येळपणे येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीत २० शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. त्यानंतर तणाव निवळला.

याबाबत माहिती अशी की, घोड धरणावर वडगाव शिंदोडी, येळपणे येथील सुमारे शंभर शेतकऱ्यांकडून एकाच ठिकाणावरून पाण्याचा उपसा केला जातो. त्यांच्या जलवाहिन्या शेेजारीच आहेत. धरणाची पाणी पातळी खाली गेल्याने पाण्यासाठी वाद सुरू झाले आहेत. वडगावच्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी येळपणे येथील शेतकऱ्यांच्या वीज मोटारी बंद करून काही मोटारींचे पाईप फोडले. त्यावर येळपणेचे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बेलवंडी पोलिसात तक्रार केली.

दहा मोटारसायकलींसह जलवाहिनी, वीज मोटारीचे पॅनल बॉक्सची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीत किराणा दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे. दंगलीची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी जादा पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचत दंगल आटोक्यात आणली. सातव यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांची बैठक घेतली शांततेचे आवाहन केले. त्यानंतर तणाव निवळला.