संतप्त गावकऱ्यांनी विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंडाचे कार्यालय जाळले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –विधवेचा विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंड आणि वाळूमाफियाचे कार्यालय गावकऱ्यांनी जाळून टाकल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील लोहणेर गावात घडली. गुंडाने विनयभंग केल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यावेळी या बंदला हिंसक वळण लागले आहे.

स्वप्नील निकम उर्फ मिरच्या भैय्या असे तडीपार गुंडाचे नाव आहे. स्वप्नील निकम उर्फ मिरच्या भय्या याला २ वर्षापुर्वी तडीपार करण्यात आले होते. तडीपार असूनही तो गावात आला होता. यावेळी आर्थिक देवाण घेवाणी दरम्यान त्याने एका विधवा महिलेचा विनयभंग केला होता.

त्याच्या या कृत्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गावात बंद पाळला होता. या बंदला हिंसक वळण लागले आणि संतप्त ग्रामस्थांनी मिरच्या भय्याचे कार्यालयच तोडून टाकले आणि त्यानंतर जाळून टाकले. त्यानंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.