गोगोईंच्या राज्यसभा नियुक्तीवरून MIM च्या औवेसींची खरमरीत टीका, म्हणाले – ‘केलेल्या मदतीचं बक्षीस मिळालंय का ?’
पोलिसनामा ऑनलाईन टीम – अयोध्या खटल्याचा गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला निकाल देण्यात आला. त्यामध्ये पाच सदस्यांच्या खंडपीठाचे अध्यक्ष रंजन गोगोई होते. त्यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवरुन एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीका करीत आगपाखड केली आहे. केलेल्या मदतीचं बक्षीस मिळालंय का? न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर नागरिकांचा कसा विश्वास बसेल असे बरेच प्रश्न उपस्थित होतायेत अशा आशयाचे ट्विट करत ओवेसी यांनी टीका केली आहे.
Is it “quid pro quo”?
How will people have faith in the Independence of Judges ? Many Questions pic.twitter.com/IQkAx4ofSf— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 16, 2020
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने राज्यसभेवर निवड केली. याबाबतची अधिसूचना गृहमंत्रालयाने जारी केली. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी एकाच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद 80(1) (अ) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला निकाल देणार्या पाच सदस्यांच्या खंडपीठाचे अध्यक्ष गोगोई हे होते. त्याच महिन्यात 17 तारखेला ते निवृत्त झाले.
3 ऑक्टोबर 2018 रोजी न्या. गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश आणि राफेल विमान खरेदीचा व्यवहार यांसारख्या प्रकरणांत निकाल देणार्या खंडपीठांचेही ते प्रमुख होते. राफेल खरेदी प्रकरणात चौकशीची मागणी त्यांच्या खंडपीठाने दोनदा फेटाळून लावली होती.
गेल्या वर्षी न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपही झाला होता. मात्र, आपल्याविरोधात हे षडयंत्र असल्याचा आरोप न्या. गोगोई यांनी केला होता. या प्रकरणात ते निर्दोष असल्याचे चौकशी समितीने म्हटले होते.