सावधान ! दुपारी 1 ते 5 दरम्यान घराबाहेर पडू नका अन्यथा….

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट असताना आता दुसरे संकट आले आहे. देशातील दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात उष्णतेचा पारा वाढणार आहे. अनेक राज्यात वाढलेल्या तापमानांमुळे लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. राजस्थानच्या चुरू येथे 50 डिग्रीच्या वर तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या बांदा आणि प्रयागराजमध्ये तापमान 48 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.

जगातील सर्वाधिक तापमान चुरू येथे
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 29-30 मे नंतर लोकांना थोडासा आराम मिळण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस म्हणजे 28 मे पर्य़ंत लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा नाही. या आठवड्याच्या शेवटी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी चुरू येथे जगातील सर्वाधिक उष्णता आहे. याशिवाय पाकिस्तानमधील जेकबाबादचे तापमान देखील 50 अंश नोंदवण्यात आले.

दिल्लीने रेकॉर्ड मोडले
हरियाणामधील हिसारचा पारा देखील वाढला आहे. हिसारमधील पारा 48 अंशावर होता तर उत्तर प्रदेशातील बांदामध्येही 48 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीने मागील 18 वर्षातील तापमानाचा विक्रम मोडला आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीमधील तापमान 47.6 डिग्री सेल्सियस होते.

1 ते 5 घरा बाहेर पडू नका
29 आणि 29 मे या दोन दिवशी वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील भारतातील लगतच्या अंतर्गत भागात वारे वाहतील. हवामान खात्याने नागरिकांना आवाहन केले आहे की, दुपारच्या वेळी सावध आणि सतर्क रहा, दुपारी 1 ते सायंकाळी 5 या दरम्यान घराबाहेर पडणे शक्यतो टाळा. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात 28 मे पर्यंत उष्णतेची तीव्र लाट असले.

महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट
उष्णतेच्या लाटांचा तडाखा सध्या महाराष्ट्रालाही बसत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानाने 45 अंशाचा आकडा गाठला आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 ते 2 जूनला मान्सूपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 11 जून रोजी पाऊस येईल.