Beed : राष्ट्रवादीने आणखी 6 नगरसेवक फोडले

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. आडसकर-जगताप वादाचा फायदा घेत राष्ट्रवादीने आणखी 6 नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे 23 पैकी 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत.

अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या हातून सत्ता (majalgan-mayer-election-bjp-loss-ncp-king) जाण्याची चिन्हे दिसत आहेत. माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब राष्ट्रवादीने केला आहे. मोहन जगताप गटाचे 2, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस गटाचे 3 व एमआयएमचा 1 नगरसेवक असे एकूण सहा नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या तंबूत आणले आहेत.

नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावावर नगराध्यक्षपदाचे शिक्कामोर्तब होणार आहे. दुसरीकडे, भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही केवळ आडसकर-जगताप यांच्यातील गटबाजी, माजी नगराध्यक्ष चाऊस यांच्यावर पक्षातील नगरसेवकांनी केलेला अविश्वासाचा ठराव या कारणांमुळे पालिकेतील सत्ता हातून जाण्याच्या मार्गावर आहे.
माजलगाव येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर तीन महिने गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत त्यांना बडतर्फ केले होते. चाऊस यांच्यावर आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. या पालिकेतील रिक्त नगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच पडली फूट
माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी माजलगावात सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. त्यामुळे ऐन नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळीच फूट पडली आहे. नगराध्यक्षपदाबरोबरच माजलगाव नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी आमदार सोळंके यांनी बंगल्याबाहेर पडत व्यूहरचना आखून भाजपसह जनविकास आघाडी, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस आणि एमआयएम अशा 18 नगरसेवकांना फोडून आपल्या गोट्यात आणले आहेत.

अन् भाजपचे स्वप्न भंगल
भाजपच्या नगरसेविका रेश्मा दीपक मेंढके यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, ही केवळ औपचारिकता आहे. भाजपचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. पुरेसे संख्याबळच नसल्यानं भाजपचे नगराध्यक्षपदाचं स्वप्न भंगल आहे.