भाजप नेते आशिष शेलारांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट, कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते विरुध्द भाजप नेत्यात दररोज विविध मुद्यावरून एकमेकाविरोधात टीका, टिप्पणी, आरोप, प्रत्यारोप करत आहेत. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना मात्र भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शेलार यांनी शरद पवार यांची भेटीचे कारण काय, भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. शेलार आणि पवार यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत. दरम्यान ही भेट राजकीय असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. यानंतर लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते. शेलार एकटेच पवारांना भेटल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतली असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. दुसरे म्हणजे ईडीच्या मुद्द्यावरूनही राजकारण तापलेले असताना या पार्श्वभूमीवर शेलार आणि पवार यांच्यात चर्चा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, यापूर्वीही आशिष शेलार आणि शरद पवार एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने एकत्रित आले होते. त्यावेळेस आशिष शेलार यांनी मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शेलार यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ ओढवली होती.