आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल, म्हणाले – ‘पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का ?’

पोलिसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार ( ashish shelar) यांनी भाष्य केलं. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली आलीय देशभक्ती. हे शरद पवारांच्या देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?”, असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या हिंसाचारावर महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन चौफेर टीका केली. “राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही. महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्लीतील आंदोलनाच्या हिंसेचं समर्थन करत आहेत. ज्यांनी आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. कुठे फेडणार ही पापं?”, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

पोलिसांवर लाठ्या उगारणाऱ्या माथेफिरू आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासोबतच माथेफिरूंची माथी भडकवणाऱ्यांच्याही मुसक्या दिल्ली पोलिसांनी आवळल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही करणार आहोत असं आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावर शिवसेनेच्या भूमिकेवरही शेलार यांनी निशाणा साधला. “रोज वचवच करणारे संजय राऊत (Sanjay Raut) आज देशातील पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाहीत?”, अशी तोफ आशिष शेलार यांनी डागली आहे. तर जवान आणि पोलिसांच्या बाजूनं शरद पवार (Sharad Pawar) यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही?, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.