गुजरात दंगल गोध्रा हत्याकांडावरची ‘ती’ रिअ‍ॅक्शन होती : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गुजरात दंगलीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअ‍ॅक्शन) होती, असे विधान पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 3) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअ‍ॅक्शन म्हणावी लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच पाटील यांना राहुल गांधींच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर आता इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील गुजरात दंगलीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. राहुल गांधींनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी केलेली चूक स्वीकारली. यापूर्वी काँग्रेसने दिल्लीत झालेल्या दंगलीबद्दलही माफी मागितली आहे. आता नरेंद्र मोदी आणि भाजपा गुजरात दंगल ही चूक होती असे म्हणणार का, मोदी आणि भाजपाने गुजरात दंगलीबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.