SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) दिला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणांचा तपास करण्यात अधिकाऱ्यांची भुमिका तसेच मुंबई शहारचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही भुमिका हलगर्जीपणाची राहिली आहे. याकरिता या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. मुंबई शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हा तपास किमान विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
मा. मु. @OfficeofUT,
50 दिवस उलटले परंतु SSR आत्महत्याप्रकरणी FIR नाही, दिशाच्या आत्महत्येबाबत पोलीस जनतेकडून माहिती मागतायत. पुरावे नष्ट केले जातायत. या हलगर्जीपणाला जबाबदार पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवा,CBI तपासात आडकाठी येणार नाही याची खबरदारी घ्या. pic.twitter.com/0z4NF8rS96— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 7, 2020
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. सुशांतच्या आत्महत्येला 50 दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर दाखल केलेला नाही. तसंच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर 50 दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास आम्हाला द्या असं आवाहन पोलिसांनी केलंय. हा निव्वळ हलगर्जीपणा आहे. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात असल्याची भावना जनमाणासात निर्माण झाली आहे.
राज्य सरकार लपवाछपवी करतेय की काय असा सवाल प्रश्न निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. ही कारवाई न झाल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागेन, असा विनंतीवजा सूचक इशारा भातखळकर यांनी पत्रातून दिला आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्र सरकारनं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला आहे. राज्य सरकार या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.