राष्ट्रीय महामार्गावर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळमधील हैद्राबाद-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. हा अपघात यवतमाळच्या वडकी गावाजवळ कार आणि ऑटो रिक्षामध्ये झाला.

भरधाव वेगात असणाऱ्या कार आणि ऑटो यांच्यात जोरदार टक्कर झाली. यामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर १२ जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळावरुन जखमींना उपचारासाठी राळेगाव आणि वडणेर इथल्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर अधिक मतदतीसाठी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने आणि मृतदेह महामार्गावरुन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पोलिसांनी ५ मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहेत.

दरम्यान, या अपघातात कोणाची चूक होती याची अधिक माहीती मिळवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहेत. तर या अपघातातील मृतांची ओळख आणि नावं पोलिसांकडून अद्याप सांगण्यात आलेली नाहीत. त्याचाही तपास पोलीस करत आहेत.