देशभरात ‘वरळी पटर्न’ राबवण्याची शक्यता, केंद्रीय पथकाकडून ‘कौतुक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे मुंबईत हाहाकार उडाला असतानाही झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसराच्या तुलनेत दक्षिण विभागाने कोरोनाला चांगलीच फाईट दिली आहे. म्हणूनच जी साऊथमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी महापालिकेने राबवलेला ’वरळी पॅटर्न’ची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. केंद्राच्या पथकानेही या पटर्नचे कौतुक केले आहे. वरळीत मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत या कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे.

दाटवस्तीच्या प्रदेशांपैकी वरळीतील कोळीवाड्याचा समावेश आहे.
येथे 50 हजारांहून जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश असून घेरांची रचनाही अगदी दाटीवाटीची आहे. त्यामुळे या ठिकाणी जर कोरोना वाढला असता तर वरळीमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. कोळीवाड्यात अगदी सिलींडरपासून दुधापर्यंत सर्व गोष्टी घरपोच देण्यात येत आहेत. परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाला रोखून ठेवण्यात आतापर्यंत यश मिळाले आहे. याठिकाणी रुग्णांना खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे.

गरम पाणी, जेवण या सर्व गोष्टींसोबत रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी योगाचेही प्रशिक्षण दिले आहे. वरळीत कोळीवाडा हा लोकसंख्येची घनता जास्त असलेला प्रदेश असूनही प्रशासनाने इथली परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. याबद्दल केंद्राच्या पथकानेही प्रशासनाचं कौतुक केले आहे. जी दक्षिण विभागाच्या कामगिरीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाबासकीची थाप दिली आहे. वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम काम करत आहे. केंद्राचं दुसरं पथकही वरळी भेट देऊन गेले, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचं कौतुक केले आहे. हे पथक वरळी पटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत.